राख वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवाच्या धडकेत सरपंचाचा मृत्यू

परळी – भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परने मोटार सायकल वरून जाणाऱ्या सरपंचाला जोराची धडक दिली यामध्ये गाडीचा चक्काचूर झाला. तर सरपंचाचा जागीच मृत्यू झाला.
औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या राखेत मोठ्या प्रमाणावर अर्थकारण दडलेलं असल्यामुळे अजूनही राख माफिया बिनधास्त राखेची वाहतूक करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे शनिवारी रात्री आपल्या गावाकडचे शेतीचे काम उरकून परळी कडे जात असताना मिरवट फाट्याजवळ राख वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्पर क्रमांक एमएच-44 – 2117 ने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये मोटार सायकल क्र एमएच 23 – 7125 चा चक्काचूर झाला तर मोटार सायकल स्वार सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. टिप्पर चालक मात्र टिप्पर घटनास्थळी ठेवून फरार झाला.
अपघात झाल्याचे समजताच नागरीक घटनास्थळी दाखल होत नागरीकांनी अपघातग्रस्ताला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सरपंचाला टिप्परने धडक दिल्यामुळे हा अपघात होता की घातपात होता या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.