क्राईमताज्या बातम्या

ईव्हीएमवर खोटे आरोप कराल, तर खबरदार ! निवडणूक आयोग दाखल करणार गुन्हे; एस चोकलिंगम यांनी दिला इशारा

मुंबई : महायुतीला विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवर आरोप केले. मात्र ईव्हीएमवर खोटे आरोप केल्यास कारवाईचा इशारा निवडणूक आयोगानं दिला.

आरोपानंतर आता राज्य निवडणूक आयोग मैदानात
विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात महायुतीला मोठं जोरदार यश मिळालं आहे. दुसरीकडं निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अपयशाचं खापर ईव्हीएमवर फोडलं. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आरोपानंतर मात्र आता राज्य निवडणूक आयोग मैदानात उतरला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी ईव्हीएममध्ये गैरप्रकार करता येतो, असा खोटा दावा आणि आरोप करण्याऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

महाविकास आघाडीच्या नेत्यांचा ईव्हीएमवर आरोप
महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ईव्हीएमवरुन आरोप केले. सायंकाळी 5 वाजतानंतर मतदानाच्या टक्केवारी वाढली. त्यामुळे सायंकाळी वाढलेल्या मतांच्या टक्केवरीवरुन प्रश्न उपस्थित केला. याबाबत बोलताना ते म्हणाले, की “विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात महाराष्ट्रात संध्याकाळी 5 नंतर मतदान वाढलं. ही चिंतेची बाब आहे. ईव्हीएम हे साधं कॅल्क्युलेटर असलं, तरी त्यामुळे मतांची संख्या सायंकाळी वाढल्याचं दिसून येते. यावरुन निवडणूक आयोग काहीतरी लपवत असल्याचं दिसते.”

खोटे दावे कराल तर, गुन्हे दाखल करू
विरोधकांनी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये पराभव झाल्यानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह लावलं आहे. ईव्हीएमवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरोप केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सावध पवित्रा घेतला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याबाबत खोटे दावे पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. विशेष म्हणजे पुण्यात बाबा आढाव यांच्या आंदोलनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवर अपयशाचं खापर फोडल्यानंतर निवडणूक आयोगानं आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी रविवारी याबाबत बोलताना, “ईव्हीएमवर सनसनाटी निर्माण करून खोटे आरोप आणि दावे करण्याचा प्रयत्न केल्यास निवडणूक आयोग या प्रकरणाची गंभीर दखल घेईल. असे खोटे दावे आणि आरोप करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाकडून कठोर कारवाई केली जाईल.”

ईव्हीएमवर आरोप करणाऱ्या सय्यद शुजावर गुन्हा दाखल
परदेशात राहून राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालावर आक्षेप घेत सय्यद शुजा याच्याकडून खोटे दावे आणि आरोप करण्यात आले होते. या प्रकरणाची निवढणूक आयोगानं गंभीर दखल घेतली असून सय्यद शुजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद शुजा यानं केलेल्या खोट्या आरोपांबाबत दिल्ली आणि मुंबई पोलीस तपास करत आहेत. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या कोणालाही सोडलं जाणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

डॉ. शामसुंदर रत्नपारखी (वृत्तपर्व संपादक)

‘संधी मिळत नसते संधी निर्माण करावी लागते’ पत्रकार क्षेत्रात मागील वीस वर्षापासून प्रथम स्थानिक आणि नंतर विभागीय वृत्तपत्रात विविध पदांवर काम करत असतानाच विद्यावाचस्पती (Ph.D) पूर्ण केली. याचवेळी या क्षेत्राशी अजून जवळून घट्ट नाते निर्माण झाले आणि त्यानंतर स्वतंत्रपणे २०१५ पासून प्रथम भारत पर्व आणि २०२१ पासून वृत्तपर्व या वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करत आहे. २०२३ मध्ये यूट्यूब चॅनल आणि आता वाचकांसाठी वृत्तपर्व पोर्टलच्या माध्यमातून लेखन. माझ्या वेबपोर्टलवर बातम्या, नवनवीन विषयांवरील लेखन, राजकिय, सामाजीक, शैक्षणिक, विज्ञान, क्रीडा, कला, संस्कृती आणि विविध सदरांचा समावेश केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button